Thursday, June 24, 2010

सिनेमा आणि आशय

"वळू" हा आशयचा अतिशय लाडका सिनेमा. त्यातील बैलाने पूर्ण गावाची उडवलेली तारांबळ पाहताना आशय जाम एन्जोय करत असतो. त्यातले "Forest म्हणजे स्वानंद गड्डमवार" हे पात्र त्याचे खास लाडके. आशय त्यांना गड्डमवार काका म्हणतो. मग त्यांचे बोलने, चालणे एवढेच काय रागावणेदेखील जशास तसे रोजच्या व्यवहारात वापरतो. शिवाय त्याची इतरांनी नोंद घ्यावी हि देखील त्याची विशेष मागणी असते. चुकून एखादे वेळेस दुर्लक्ष केले तर तो स्वतःहून त्याची आठवण करून देतो अन्यथा परत सगळे रिपीट करतो. तर असे हे आशयचे सिनेमाचे भुत किंवा सिनेमाप्रेम एवढेच मर्यादित न राहता आता ते सर्वच गोष्टींच्या हुबेहूब अनुकरणातून येत होते, जे थांबवणे अतिशय गरजेचे बनले होते.
मग बाबांनी सुरुवात गड्डमवार काका यांच्यापासून केली. बाबा आशयला सांगत होता, म्हणजे प्रयत्न करत होता कि सिनेमातले कोणतेही पात्र खरे नसते (बाबाला लगेच जाणवले कि आता हा 'पात्र म्हणजे काय?' ते विचारणार) म्हणून लगेच बाबाने सावरले कि काम करणारे कोणीही खरे नसून ते फक्त त्या सिनेमापुरते नाटक करत असतात.
जसे तुम्ही तुमच्या शाळेत सगळ्यांनी मिळून एका गाण्यात वेगळे वेगळे ड्रेस घालून गाणे म्हणले होते ... कोणी झाड झाले होते, कोणी जोकरचा ड्रेस घालून जोकर बनले होते, एक मुलगी परी बनली होती ...
आशयने लगेच पुढचा प्रश्न विचारला 'बाबा, परी म्हणजे काय ?'.
मग बाबा उत्तरला 'बेटा, पंख लावलेली मुलगी म्हणजे परी '
लगेच बालमनात पुढचे प्रश्न तयार .. 'पण बाबा तिला पंख कुठून आले ? कसे आले ? ती उडू शकते ? मी पंख लावले तर उडू शकेन ?'
आता नवीनच आव्हान बाबासमोर उभे होते ??
बाबा म्हणाला 'अरे बेटा फुलपाखराला असतात न तसे पंख पण खोटे खोटे तिने लावले रे ज्यामुळे उडता येत नसते... ते लावून ती मुलगी परी असल्याचे नाटक करते रे .. गड्डमवार काकासारखे .. कशीबशी गाडी ज्या रुळांवरून जात होती तिकडे आली .. पण आशयचा मेंदू थोडाच तसे होऊ देणार होता. लगेच पुढचा प्रश्न आला .. 'बाबा नाटक म्हणजे काय रे ?'
मग बाबा उत्तरला 'आपण कोणतीही गोष्ट गम्मत म्हणून थोडा वेळच करतो न ! त्याला नाटक म्हणतात. तू नाही का कधी कधी रडायचे नाटक करतोस !!'
आशयने लगेच गालातल्या गालात हसून प्रतिसाद दिला. मग बाबाने परत त्याची सिनेमाची गाडी पुढे दामटली.
बाबा त्याला समजावून सांगू लागला कि गड्डमवार काकांचे खरे नाव अतुल कुलकर्णी आहे आणि त्यांनी कधीच वळू पकडलेला नाही. पण या सिनेमामध्ये ते आणि त्यांच्यासोबतचे सर्वजण वळू पकडण्याचे नाटक करत असतात. एवढेच काय तो वळू पण खरा नसतो. तो पण एका काकांच्या शेतात काम करणारा बैल आहे.
"बाबा खरच !!!" आशयने विचारले. बाबावर श्रद्धा असल्याने अविश्वास पण दाखवता येत नव्हता आणि इतक्या दिवसांचे असलेले गड्डमवार काका खरे नाहीत ह्यावर विश्वास पण बसत नव्हता आणि गम्मत म्हणजे हे सगळे स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर आम्ही वाचू शकत होतो. मग बाबा आशयला जवळ घेऊन म्हणाला, 'बेटा, आपण जेव्हा अतुलकाकांना भेटू न, तेव्हा हे खरे आहे कि नाही ते तूच त्यांना विचार.'
आशयला थोडेसे बरे वाटले कि बाबा आपल्याला थेट अतुलकाकालाच विचारायची संधी देणार आहे. पण लगेच बालमनात प्रश्न उपस्थित झाला... आशय म्हणाला 'बाबा आपण खरच अतुलकाकांना भेटायचे आहे ? ते लातूरला येणार आहेत कि गांधीनगरला ? कि आपणच त्यांच्या गावाला जायचे आहे ? पण ते कोणत्या गावाला राहतात ?'. मग बाबा म्हणाला ते आपण त्यांच्याशी बोलून ठरवू या. त्यांना कधी रिकामा वेळ आहे ते बघून आपण त्यांना भेटू. आशयने वेळ न दवडता विचारले "पण बाबा तुम्ही तर सोबत असाल न माझ्या ??"

"किती ही निरागसता आशयच्या बालमनाची !!!"
अशा रीतीने सिनेमाचे भूत काही अंशी का होइना पण उतरले खरे.

Tuesday, June 15, 2010

कडू कडू कारले

बरेच दिवसात कारल्याची भाजी केली नव्हती म्हणून यावेळेस मुद्दाम कारले आणले होते. भाजी चिरायला घेतली तेव्हा आशय तिथेच बसला होता. बराच वेळ माझ्या शेजारी बसून तो निरीक्षण करत होता. विचार करून थोड्या वेळाने कारले बघून त्याची प्रतिक्रिया आली .. "मम्मा मला कारल्याची भाजी आवडत नाही". मी नेहमीप्रमाणे त्याला उत्तरले, "बाळा, तुला माहित आहे का !! कारले खाल्ल्याने काय होते ??? क्षणाचाही विलंब न करता तो उत्तरला "हो !! माहित आहे .. ताकद येते "... आता मला जरा विचार करूनच उत्तर देणे भाग होते. कारण नेहमी ताकद आणि strong होणे या दोन्ही गोष्टी त्याला चांगल्याच पाठ झाल्या होत्या. मी क्षणभर विचार करत होते. लगेच आशय म्हणाला, 'सांग न मम्मा ..काय होते ??' विचार करून मी त्याला म्हणाले, कि ताकद तर येतेच शिवाय आपले पोट पण छान राहते (काही तरी बोलून वेळ मारून नेणे मला भाग होते). परत त्याची चौकस बुद्धी जागरूक झाली. मला लगेच पुढच्या प्रश्नाला सामोरे जायचे होते ... 'कस काय ग मम्मा ??'. आता माझी खरी परीक्षा होती. वेळ मारून नेली तर परत कधी तरी आत्ता सांगितलेल्या उत्तराबद्दल चौकशी होणार हे नक्की. तरीही ढाल हातात घेऊन मी मैदानात उतरले. विचार करत आशयला विचारले, 'बाळा कारल्याची चव कशी असते?' आशु उत्तरला "उम्म्म !! कडू कडू". मी म्हणाले आशय कडू रस जो असतो न तो आपले पोट साफ करतो. आपण घेतो ते औशध कसे कडूच असते न .. ते आपल्याला आवडते का ? (माझी साधी अपेक्षा कि तो नाही म्हणूनच उत्तरेल पण छे !!) आशय म्हणाला मम्मा मला तर औशध घ्यायला आवडते .. (माझ्या डोक्यात तारे चमकले) मी म्हणाले "बाळा तुला आवडते पण बाकीच्यांचे काय? सगळेजण आवडीने औशधे खातात का ? नाही न !!" तसेच तुला कारले आवडत नसले तरी ते खायचे असते.
एवढ्या वेळ केलेल्या मशक्कतनंतर कसेबसे बाळराजांनी हो म्हंटले आणि कारले खायला नावडीने का होईना पण होकार भरला !! ..
हुश्श् !!!