Wednesday, May 9, 2012

संस्कार - सुविचार

संस्कार माणसाच्या मनावर खूप खोलवर परिणाम करून जात असतात.
आज सहज मला आलेल्या इमेलमधे खालील विचार वाचण्यात आले आणि मन एकदम १५-१७ वर्ष मागे गेलं.
"सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही."
सातवीत असताना शाळेत रोज मोठ्या फळ्यावर लिहिलेला सुविचार लिहिणे बंधन कारक होते एवढेच नव्हे तर त्यासाठी वेगळी/ स्वतंत्र वही आम्हाला घालावी लागत असे, नी ती नियमितपणे तपासली पण जात असे. त्यामुळे ती नीट नेटकी ठेवणे, त्या वहीत सुविचार सुवाच्य अक्षरात लिहिणे ह्या गोष्टी ओघाने आल्याच. आम्हाला तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खूपच त्रासदायक वाटायच्या .. खेळण्याच्या नादात एखादे दिवशी नेमके सुविचार लिहिणे राहून जायचे नी दुसऱ्या दिवशी हमखास वही तपासलीच जायची. मग वैताग वाटायचा असल्या गोष्टींचा ! वाटायचे काय फरक पडतो ह्या सुविचारांनी आणि ते लिहून ठेवल्याने .. आहे ते आयुष्य थोडेच बदलते ह्यामुळे..
पण जसजसे आयुष्य व्यतीत व्हायला लागले तसतसे शाळेत लिहिलेल्या सुविचारांनी मनाला एक प्रकारचे धैर्य तर मिळालेच शिवाय कठीण परिस्थितीत मार्गदर्शनही !! तेव्हाचा थोडासा त्रास नंतर आयुष्यभरासाठी सुसह्य परिस्थिती निर्माण करण्याचे काम करत होता, अवघड वळणावर योग्य निर्णय घेणे, तोल ढळू न देणे हे त्यामुळेच घडले. 
काही गोष्टींची किंमत वेळ आल्यावरच कळते हे बाकी खरेच; मग त्यात संस्कारही आलेच !!

Thursday, April 26, 2012

आज बरेच दिवसांनी आम्ही एकत्र गप्पा मारत टीव्ही बघत होतो. लाडका कार्यक्रम "सा रे ग म प" चालू होता. सूत्रधाराने त्यातल्या एका स्पर्धकासोबत ती करत असलेल्या एका चित्रपटाबद्दल चर्चा सुरु केली. त्यावरून आशयच्या डोक्यात नेहमीप्रमाणे प्रश्न उपस्थित झाला नी त्याने आम्हाला किंबहुना अमोलला एक प्रश्न विचारला.
आशय म्हणाला,"बाबा,  मम्माचे लग्नापूर्वीचे नाव 'अपर्णा कुलकर्णी' होते ना ? तुझ्याशी लग्न झाल्यावर ते 'अपर्णा गोवंडे' असे झाले ना ?" अमोलने होकार दिला.
क्षणभर विचार करून आशयने लगेच दुसरा प्रश्न विचारला (जो मला अगदी अपेक्षित होता, किंबहुना मी त्याचीच वाट पहात होते)  
मग बाबा तुझे लग्नापूर्वीचे नाव काय होते ?अमोल गोवंडेच होते का ?" आता मात्र मला हसू आवरणे कठीण होत होते आणि अमोलची गोची होत होती (जी त्याच्या चेहऱ्यावर दिसत असूनसुद्धा तो लपवण्याचा प्रयत्न करत होता).
हसू आवरण्याचा प्रयत्न करत अमोल आशयला काय सांगावे ह्याचा विचार करू लागला. 
मला खूपच मजा वाटत होती, शिवाय पुरुषप्रधान संस्कृतीचे अमोल आता काय नी कसे वर्णन करणार आणि आशूला ते सगळे कसे समजावून सांगणार ह्याची पण उत्सुकता लागली होती. मी अमोलला म्हंटले " सांगा अमोल गोवंडे, तुमचे नाव काय होते लग्नाआधी आणि नंतर; आणि ते का नाही बदलले ?"
अमोलने आशयला सांगितले,' अरे बाळा, माझे लग्नापूर्वीचे आणि नंतरचे दोन्ही नावे अमोल गोवंडे अशीच आहेत".
"असे का?" हे आशय विचारणार इतक्यात आशयचे लाडके गाणे " राधा, राधा, राधा, राधा, राधा कुठे गेली माझी ?" सुरु झाले. आशयने फक्त एकदा अमोलकडे प्रश्नार्थक नजरेने पहिले आणि तो गाणे ऐकण्यात आणि गुणगुणण्यात दंग झाला.
अमोलने सुटकेचा श्वास सोडला, पण मला मात्र अमोलचा चेहरा बघूनच हसू येत होते.
याशिवाय अनेक निरर्थक प्रश्न क्षणात गर्दी करून समोर उभे ठाकले पण सवयीने "हा सामाजिक जडण घडणीचा भाग आहे असे स्वतःच स्वतःला समजावून मी त्यांची उत्तरे शोधणे टाळले.