Wednesday, May 9, 2012

संस्कार - सुविचार

संस्कार माणसाच्या मनावर खूप खोलवर परिणाम करून जात असतात.
आज सहज मला आलेल्या इमेलमधे खालील विचार वाचण्यात आले आणि मन एकदम १५-१७ वर्ष मागे गेलं.
"सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही."
सातवीत असताना शाळेत रोज मोठ्या फळ्यावर लिहिलेला सुविचार लिहिणे बंधन कारक होते एवढेच नव्हे तर त्यासाठी वेगळी/ स्वतंत्र वही आम्हाला घालावी लागत असे, नी ती नियमितपणे तपासली पण जात असे. त्यामुळे ती नीट नेटकी ठेवणे, त्या वहीत सुविचार सुवाच्य अक्षरात लिहिणे ह्या गोष्टी ओघाने आल्याच. आम्हाला तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खूपच त्रासदायक वाटायच्या .. खेळण्याच्या नादात एखादे दिवशी नेमके सुविचार लिहिणे राहून जायचे नी दुसऱ्या दिवशी हमखास वही तपासलीच जायची. मग वैताग वाटायचा असल्या गोष्टींचा ! वाटायचे काय फरक पडतो ह्या सुविचारांनी आणि ते लिहून ठेवल्याने .. आहे ते आयुष्य थोडेच बदलते ह्यामुळे..
पण जसजसे आयुष्य व्यतीत व्हायला लागले तसतसे शाळेत लिहिलेल्या सुविचारांनी मनाला एक प्रकारचे धैर्य तर मिळालेच शिवाय कठीण परिस्थितीत मार्गदर्शनही !! तेव्हाचा थोडासा त्रास नंतर आयुष्यभरासाठी सुसह्य परिस्थिती निर्माण करण्याचे काम करत होता, अवघड वळणावर योग्य निर्णय घेणे, तोल ढळू न देणे हे त्यामुळेच घडले. 
काही गोष्टींची किंमत वेळ आल्यावरच कळते हे बाकी खरेच; मग त्यात संस्कारही आलेच !!